Skip to main content
कवितेतून जगण्याचे मर्म उलगडले - वैभव जोशी
कवितेतून जगण्याचे मर्म उलगडले - वैभव जोशी
तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) माझ्या स्वभावाला अनुसरून मी जगत गेलो. जे जगलो ते शब्दात उतरवले. आयुष्यात कुठल्याच गोष्टी ठरवून केल्या नाहीत, मात्र शब्दांची सलगी केली. आणि हळूहळू कवितेच्या माध्यमातून जगणे उलगडत गेले, असे मत प्रसिद्ध चित्रपट गीतकार व कवी वैभव जोशी यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित वाङमय मंडळ उदघाटन व भित्तिपत्रक अनावरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, नामवंत साहित्यिक डाॅ तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, डाॅ विजयकुमार खंदारे, डॉ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत प्रा सत्यजित खांडगे व डाॅ संदीप कांबळे यांनी घेतली. मुलाखतीच्या माध्यमातून जोशी यांच्या समृद्ध कविता निर्मितीचा प्रवास त्यातून उलगडला व रसिक श्रोतेजण मंत्रमुग्ध झाले.
जगण्याचे दैनंदिन व्यवहार वाचनामुळेच समृद्ध होत असतात. वाङमये मंडळाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस पोषक वातावरण निर्माण करते. त्यातूनच विद्यार्थी समृद्ध होतात. पर्यायाने समृद्ध पिढी निर्माण होते. दैनंदिन जगण्यात साहित्याचे स्थान मोठे आहे असे मत डाॅ तुकाराम रोंगटे यांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ मलघे म्हणाले की, भाषा जगणे समृद्ध करीत असते.भाषेत खूप ताकद असून माणसास माणूस म्हणून समाजात उभे करण्याचे आत्मभान भाषा व साहित्य देत असते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डाॅ विजयकुमार खंदारे यांनी केले. तर सूत्रसंचालन डाॅ संदीप कांबळे यांनी केले. प्रा सत्यजित खांडगे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment